Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, ३० डिसेंबर, २०२३

dahavi-itihas 2-इतिहासलेखन : भारतीय परंपरा

दहावी- इतिहास
 2-इतिहासलेखन : भारतीय परंपरा



पुढील संकल्पना स्पष्ट करा : (प्रत्येकी २ गुण)

  (१) प्राच्यवादी इतिहासलेखन.

  उत्तर : (१) अठराव्या शतकाच्या उत्तराधांत युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना 'प्राच्यवादी अभ्यासक' असे म्हणतात. (२) या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहासलेखन केले. या लेखनाला प्राच्यवादी इतिहासलेखन' असे म्हणतात. (३) या प्राच्यवादी अभ्यासकांत छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले.

-------------------------------------------------------------------

 (२) राष्ट्रवादी इतिहासलेखन.

  उत्तर : (१) एकोणिसाव्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षणपद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहासलेखन केले त्या लेखनास 'राष्ट्रवादी इतिहासलेखन' असे म्हणतात. (२) या राष्ट्रवादी इतिहासलेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहदूषित इतिहासलेखनाला विरोध केला. (३) भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले. (४) राष्ट्रवादी इतिहासलेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यास प्रेरणा मिळाली; तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली.
-------------------------------------------------------------------

 (३) वंचितांचा इतिहास.

 उत्तर : (१) समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले; अशा समूहांच्या इतिहासाला 'वंचितांचा इतिहास' असे म्हणतात. (२) मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. (३) इटालियन तत्त्वज्ञ अँटोनिओ ग्रामची याने इतिहासलेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली. (४) भारतात महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहासलेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते.
-------------------------------------------------------------------

(४) वसाहतवादी इतिहासलेखन.

उत्तर : (१) ब्रिटिश सत्तेच्या वसाहतवादी धोरणाच्या समर्थनार्थ आणि या धोरणाला पोषक होईल, अशा प्रकारचे जे इतिहासलेखन केले गेले, त्याला 'वसाहतवादी इतिहासलेखन' असे म्हणतात. (२) भारतविषयक वसाहतवादी इतिहासलेखन करणाऱ्यांत प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी व ख्रिश्चन धर्मप्रसारक यांचा समावेश होतो. (३) अशा इतिहासलेखनात भारतीय इतिहास व संस्कृती गोण दर्जाची असल्याचे सूचित केले आहे.
-------------------------------------------------------------------

टिपा लिहा (प्रत्येकी २ गुण)

 (१) मराठीतील खरी.

 उत्तरे : प्रामुख्याने मराठाशाहीत बखरी लिहिल्या गेल्या. (१) कृष्णाजी अनंत सभासद याने लिहिलेल्या 'सभासद बखरी'त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती मिळते. (२) 'भाऊसाहेबांची बखर' या बखरीतून पानिपतच्या तिसऱ्या लढाईचे वर्णन वाचायला मिळते. (३) 'पानिपतची बखर' अशी एक स्वतंत्र बखरही पानिपतच्या लढाईवर आहे. (४) होळकरांचे घराणे व त्यांचे मराठा सत्तेतील योगदान सांगणारी 'होळकरांची कैफियत' ही एक बखर आहे. अशा रितीने शूरवीरांच्या पराक्रमांवर लढायांवर लिहिलेल्या अनेक बखरी ऐतिहासिक साहित्यात आढळून येतात. या बखरी इतिहासलेखनासाठी महत्त्वाची लिखित साधने आहेत.
-------------------------------------------------------------------

(२) अलेक्झांडर कनिंगहॅम.

 उत्तर : (१) एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश अमदानीत भारतीय पुरातत्त्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. (२) 'भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण' या स्वतंत्र खात्याची स्थापना होऊन अलेक्झांडर कनिंगहॅम यांची या खात्याचे पहिले सरसंचालक म्हणून नेमणूक झाली. (३) त्यांच्या देखरेखीखाली सारनाथ, सांची अशा प्राचीन स्थळी उत्खनन करण्यात आले.. (४) बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असणाऱ्या अनेक ठिकाणी त्यांनी उत्खनन आणि संशोधन करून त्यावर ग्रंथ लिहिले.
-------------------------------------------------------------------

(३) जेम्स मिल.

उत्तर : (१) ब्रिटिश इतिहासकार जेम्स मिल याने 'द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया' हा ग्रंथ लिहिला. (२) १८१७ साली त्याने तीन खंडांत हा ग्रंथ प्रसिद्ध केला. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ म्हणून या ग्रंथाचे महत्त्व आहे.(३) तरीही, जेम्स मिलच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव जाणवतो. (४) भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधीचा त्याचा पूर्वग्रहदुषित दृष्टिकोन या ग्रंथातून स्पष्टपणे व्यक्त होताना दिसतो.
-------------------------------------------------------------------

(४) जेम्स अँट डफ.

उत्तर : (१) जेम्स ग्रँट डफ या ब्रिटिश अधिकाऱ्याने 'ए हिस्टरी ऑफ द मराठाज्' हा ग्रंथ तीन खंडांत लिहिला. (२) मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँट डफ याचा समावेश होतो. (३) भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची वृत्ती जेम्स ग्रँट डफच्या या इतिहास ग्रंथातही जाणवते. परंतु पहिला सुसूत्र, एकसंध मराठ्यांचा इतिहास हे या ग्रंथाचे मूल्य महत्त्वाचे आहे. (४) नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि वि. का. राजवाडे यांनी ग्रँट डफच्या इतिहासलेखनाच्या मर्यादा दाखवून दिल्या आहेत.
-------------------------------------------------------------------

(५) स्त्रीवादी इतिहासलेखन

 उत्तर : (१) स्वातंत्र्यपूर्व काळात ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, डॉ. रखमाबाई अशा स्त्रीवादी इतिहास लेखिका होऊन गेल्या. परी आणि कामाच्या ठिकाणी स्त्रियांना मिळणारी अन्यायी वागणूक आणि स्त्री-पुरुष असमानता यांवर या लेखिकांनी लेखन केले. (२) दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात स्त्रियांकडून लेखन केले गेले. (३) स्वातंत्र्योत्तर काळात दलित स्त्रियांचे जीवन, सामाजिक वर्ग, जात इत्यादींवर शर्मिला रेगे यांनी लिहिलेल्या त्यांच्या लेखांचे संकलन 'रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर रीडिंग दलित वुमेन्स : 'टेस्टिमोनीज' या ग्रंथात केले. (४) मीरा कोसंबी या स्त्रीवादी लेखिकेने आपल्या 'क्रॉसिंग थ्रेशोल्डस् : फेमिनिस्ट एस्सेज इन सोशल हिस्टरी' या पुस्तकात महाराष्ट्रातील डॉ. रखमाबाई, पंडिता रमाबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावर निबंध लिहिले आहेत.
-------------------------------------------------------------------

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा : (प्रत्येकी ३ गुण)

* (१) प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.

*  उत्तर : (१) इंग्रजी शिक्षणाने भारतीयांत निर्माण झालेल्या आत्मजाणिवेने राष्ट्रवादी इतिहासलेखनास प्रवृत्त केले. (२) ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतांतील इतिहासलेखकांनी विरोध केला. (३) आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष गेले.(४) राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा प्रभाव होताच. त्यातूनच. प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.

-------------------------------------------------------------------

(३) भारतीय संस्कृतीचा इतिहासापूर्वी सहस्रकात मागे जाऊ शकतो, हे सिद्ध झाले.

 उत्तर : (१) जगातील प्राचीन संस्कृतीत भारतीय संस्कृतीचा समावेश होतो. (२) १९२० साली पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे संचालक मार्शल यांच्या देखरेखीखाली हडप्पा आणि मोहेंजोदडो येथे केलेल्या उत्खननात हडप्पा या प्राचीन संस्कृतीचा शोध लागला. (३) ही संस्कृती सुमारे पाच हजार वर्षापूर्वीची असावी, असे पुरातत्त्वाने सिद्ध केले; म्हणून भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी तिसन्या सहस्रकापर्यंत मागे जाऊ शकतो, हे सिद्ध झाले.
-------------------------------------------------------------------

(४) इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार होणे आवश्यक होते.

उत्तर : (१) भारताच्या इतिहासलेखनात सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने पुरुष अभ्यासकच काम करीत होते, त्यामुळे इतिहासातील स्त्रियांच्या कार्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले होते. (२) दुर्लक्षित झालेल्या स्त्रियांच्या कार्यावर नव्याने प्रकाश टाकणे आणि त्यांचे कार्य उलगडून दाखवणे आवश्यक होते. (३) स्त्रियांनी निर्माण केलेले साहित्य संकलित करणे आणि त्याचे संशोधन करणे हेही स्त्रीवादी इतिहासकारांपुढे आव्हान होते. अशा रितीने इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार होणे आवश्यक होते.
-------------------------------------------------------------------

(५) गोविंद सखाराम सरदेसाई यांना लोक 'रियासतकार' म्हणूनच ओळखू लागले.

उत्तर : (१) गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडांत प्रसिद्ध केला(२) 'मराठा रियासत' प्रकाशित करून त्यांनी मराठी इतिहासलेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली. (३) त्यांचे हे कार्य खूपच लोकप्रिय झाले, त्यामुळेच लोक त्यांना 'रियासतकार सरदेसाई' म्हणूनच ओळखू लागले.
-------------------------------------------------------------------

पुढील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा : (प्रत्येकी ३ गुण) *

 (१) बाबराने आपल्या आत्मचरित्रात कोणते वर्णन केले आहे?

 उत्तर : बाबराने आपल्या तुझुक-ई-बाबरी या आत्मचरित्रात पुढील बाबींची वर्णने केली आहेत- (१) त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने (२) ज्या ज्या प्रदेशांत त्याने प्रवास केला, त्यांची वर्णने आहेत. (३) शहरांची वर्णने आहेत. (४) स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज आणि वनस्पतीसृष्टी यांची निरीक्षणे बारकाईने नोंदलेली आहेत.
-------------------------------------------------------------------

(२) राष्ट्रवादी इतिहासलेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते ?

उत्तर: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले सर्व लिखाण राष्ट्रवादी विचारांनी भारलेले होते. त्यांचे राष्ट्रवादी इतिहासलेखनातील योगदान पुढीलप्रमाणे- (१) १८५७ साली भारतात झालेल्या बंडाकडे त्यांनी - ब्रिटिशांविरुद्ध केलेला तो पहिला स्वातंत्र्यसंग्राम या दृष्टीने पाहिले व त्यावर १८५७ चे स्वातंत्र्यसमर' असे पुस्तक लिहिले. (२) त्यांच्या या आणि अन्य ग्रंथांमुळे राष्ट्रवादी इतिहासलेखनाला प्रेरणा मिळाली. (३) प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. (४) दक्षिण भारताच्या इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले....

--------------------------------------------

(३) इतिहासलेखनाच्या वाटचालीतील बाणभट्टाचे कार्य लिहा. 

उत्तर : (१) प्राचीन काळातील राजांची चरित्रे लिहिणे हा इतिहासलेखनातील महत्त्वाचा टप्पा होता. (२) इसवी सनाच्या सातव्या शतकात बाणभट्टाने 'हर्षचरित' हा संस्कृत काव्यग्रंथ लिहिला. (३) हा ग्रंथ ऐतिहासिक चरित्रग्रंथाच्या स्वरूपात आहे. (४) या काव्यात त्याने तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिकवादी चित्रण केलेले आहे.
-------------------------------------------------------------------

(४) 'राजतरंगिणी' या ग्रंथाविषयी माहिती लिहा.

 उत्तर : (१) कल्हण याने इसवी सनाच्या १२व्या शतकात 'राजतरंगिणी' हा ग्रंथ लिहिला.(२) हा ग्रंथ काश्मीरच्या इतिहासावर रचलेला आहे. (३) या ग्रंथात काश्मीरच्या राजकुलांच्या अधिकृत नोंदी, स्थानिक परंपरा, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, कोरीव लेख इत्यादी अनेक ऐतिहासिक साधनांचा अभ्यास करून माहिती दिलेली आहे. (४) इतिहासलेखन शास्त्रशुद्ध कसे असावे, याचा हा ग्रंथ उत्तम नमुना आहे.

-------------------------------------------------------------------

(५) स्वतंत्र काळातील इतिहासलेखनाचे स्वरूप लिहा

 उत्तर : (१) स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहासलेखनात राजकीय मोहबरोबरच सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अंगांचाही विचार होऊ लागला, (२) इतिहासलेखनात मार्क्सवादी इतिहास, वंचितांचा इतिहास व स्त्रीवादी इतिहास असे नवे वैचारिक प्रवाहही समाविष्ट झाले. (३) या बदललेल्या स्वरूपामुळे इतिहासलेखनाची व्याप्तीही व्यापक झाली.
-------------------------------------------------------------------


(६) झियाउद्दीन बरनी याने सांगितलेले इतिहासलेखनाचे हेन् कोणते ?

 उत्तर : झियाउद्दीन बरनी याने आपल्या ग्रंथात इतिहासलेखनाचे पुढील हेतू स्पष्ट केले आहेत- (१) राज्यकत्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून इतिहासकाराचे कर्तव्य संपत नाही. (२) त्या राज्यकर्त्यांच्या चुकांचे आणि दोषांचेही त्याने चिकित्सक विवेचन करायला हवे. (३) त्या राज्यकर्त्यांच्या काळात असणारे संत, विद्वान व्यक्ती. अभ्यासक आणि साहित्यिक यांचे तत्कालीन सांस्कृतिक जीवनातील प्रभावही त्याने लक्षात घ्यायला हवेत. अशी व्यापक विचारसरणी ठेवून इतिहासलेखन व्हावे, असे बरनी याचे मत होते.
-------------------------------------------------------------------


(क) स्त्रीवादी इतिहासलेखनातील ताराबाई शिंद यांचे महत्त्व स्पष्ट करा.


उत्तर : स्वातंत्र्यपूर्वकाळात स्त्रीवादी इतिहासलेखन करणाऱ्या स्त्री- इतिहासकारांत ताराबाई शिंदे यांनी पुढील महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहे- (१) त्यांनी १८८२ मध्ये 'स्त्री-पुरुष तुलना' हे पुस्तक लिहिले. हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. (२) या पुस्तकात त्यांनी स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य केले. (३) ताराबाईंनी समाजातील पुरुषप्रधान व्यवस्थेला आणि जातिव्यवस्थेला विरोध करणारे लेखन केले.

-------------------------------------------------------------------


(२) दरबारी असलेल्या मुस्लीम इतिहासकारांच्या लेखनात कोणत्या गोष्टी प्रामुख्याने व्यक्त होतात ?

उत्तर: मुघल दरबारी असलेल्या मुस्लीम इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची केलेली स्तुती व त्यांच्याबद्दलची निष्ठा या दोन गोष्टी प्रामुख्याने व्यक्त होतात.
-------------------------------------------------------------------


(३) अबुल फजल याचे इतिहासलेखन वास्तववादी होते, असे का मानले जाते ?

उत्तर : (१) अबुल फजल याने लिहिलेला 'अकबरनामा' हा ग्रंथ त्याची चिकित्सक दृष्टी दर्शवतो. (२) या ग्रंथासाठी त्याने अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक संकलन केले होते.. (३) मिळालेल्या माहितीची त्याने विश्वासार्ह अशी कसून छाननी केली. (४) लेखनात कोणताही पूर्वग्रह डोकावणार नाही याची त्याने काळजी घेतली; म्हणूनच अबुल फजल याचे इतिहासलेखन संशोधनपूर्ण आणि वास्तववादी होते, असे मानले जाते.
-------------------------------------------------------------------


पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा : (प्रत्येकी ४ गुण)

 (1) मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय ?

  उत्तर : स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहासलेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात; त्यात 'मार्क्सवादी इतिहासलेखन' हा एक प्रमुख प्रवाह आहे. (१) मार्क्सवादात वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे. माक्संच्या विचारांवर आधारित जे इतिहासलेखन केले गेले त्याला 'मार्क्सवादी इतिहासलेखन' असे म्हणतात.(२) मार्क्सवादी इतिहासलेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. (३) प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो, याचे विश्लेषण करणे, हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे मुख्य सूत्र आहे. (४) मार्क्सवादी इतिहासकारांनी जातिव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहासलेखनात प्रभावीपणे केलेला दिसून येतो..
-------------------------------------------------------------------

(२) इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहासलेखनातील योगदान स्पष्ट करा.

 उत्तर : भाषाशास्त्र, व्युत्पत्तिशास्त्र आणि इतिहासलेखन यांत मूलभूत संशोधन करणाऱ्या वि. का. राजवाडे यांचे इतिहासलेखनातील योगदान पुढीलप्रमाणे- (१) राजवाडे यांनी 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' असे शीर्षक असणारे २२ खंड संपादित केले. (२) इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होय, हा विचार मांडला. (३) केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकिकती म्हणजे इतिहास नव्हे, असे त्यांचे मत होते. (४) आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे, हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला. (५) अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे, याबाबत ते आग्रही होते. (६) स्थल, काल व व्यक्ती या त्रयींनी बद्ध झालेल्या मानवी प्रसंगांचे वर्णन इतिहासलेखनात असायला हवे असे त्यांचे मत होते. इतिहासाचार्य राजवाडे यांनी केलेले ऐतिहासिक लेखन व मांडलेली मते हे इतिहासलेखनाला दिलेले मोठे योगदान आहे.
-------------------------------------------------------------------

(३) भारताच्या प्राचीन काळातील इतिहासलेखनाविषयीची माहिती लिहा


. उत्तर अतिप्राचीन काळात मौखिक परंपरेनेच पूर्वजांच्या पराक्रमाच्या कथा, परंपरा व घटना जपल्या जात असत. (१) इसवी सनाच्या तिसऱ्या सहस्रकापासून म्हणजे प्या संस्कृतीत लेखनकला अस्तित्वात आली; परंतु ही लिपी वाचण्यात संशोधकांना अदयाप यश आलेले नाही. (२) कोरीव लेखांच्या स्वरूपातील लिखित साहित्य, हे भारतातील सर्वाधिक प्राचीन असे ऐतिहासिक साहित्य होय. सम्राट अशोकाने दगडांवर व दगडी स्तंभांवर कोरलेले इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतकातील हे लेख होत.(३) इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूंची नाणी, मूर्ती, शिल्पे व ताम्रपटांवरील कोरीव लेख हे प्राचीन इतिहासलेखन होय. (४) रामायण, महाभारत, वेद, जैन व बौद्ध ग्रंथ ही प्राचीन इतिहासलेखनाची महत्त्वाची साधने होत. (५) त्यानंतरचे इतिहासलेखन म्हणजे अनेक ऋषींनी, लेखकांनी लिहिलेले ग्रंथ, काव्ये, नाटके आणि परकीय प्रवाशांनी लिहिलेली प्रवासवर्णने होत.

-------------------------------------------------------------------

(४) मॅक्सम्युलर याचे कार्य लिहा.

 उत्तर : प्राच्यवादी इतिहासलेखकांत फ्रेडरिक मॅक्सम्युलर या जर्मन अभ्यासकाचा समावेश होतो. त्याने साहित्यक्षेत्रात पुढील महत्त्वपूर्ण कार्य केले (१) ऋग्वेदाचे संकलन केले. हे संकलन - सहा खंडांत प्रसिद्ध झाले आहे. (२) त्याने ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. (३) 'हितोपदेश' या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. (४) संस्कृत साहित्यात त्याला रुची होती. त्याच्या दृष्टीने संस्कृत ही इंडो-युरोपीय भाषागटातील अतिप्राचीन भाषा आहे. (५) त्याने 'द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट' असे शीर्षक असलेले ५० खंड संपादित केले.
-------------------------------------------------------------------

(५) वंचितांच्या इतिहासलेखनातील फुले-आंबेडकर यांचे कार्य स्पष्ट करा.


उत्तर : (१) समाजातील दुर्लक्षित समूहाच्या लोकपरंपरांचा इतिहास म्हणजे 'वंचितांचा इतिहास' होय. या वंचितांच्या इतिहासाचा विचार एकोणिसाव्या विसाव्या शतकात महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांनी आपल्या लेखनात मांडला. (२) 'गुलामगिरी' या ग्रंथात महात्मा फुले यांनी समाजातील शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. (३) धर्माच्या, जातीच्या आणि परंपरांच्या नावाखाली होणारे स्त्रियांचे आणि शूद्रांचे शोषण कसे होते, हे दाखवून दिले. (४) भारताच्या राजकीय व सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असूनही भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहासलेखनात त्याकडे दुर्लक्ष झाले, हे डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले. (५) दलितांवरील अन्याय हाच विषय त्यांच्या सर्व लेखनाचा गाभा होता. 'हू वेअर द शूद्राज' आणि 'द अनटचेबल्स' हे त्यांचे दोन ग्रंथ वंचितांच्या इतिहासावरच आहेत.

-------------------------------------------------------------------

प्रश्न. दिलेल्या ताम्रपटावरील लिपी चिन्हे व त्यातून जाणवणा अर्थ यांची माहिती लिहा


उत्तर :(१) चित्रात दिलेला ताम्रपट उत्तर प्रदेशातील गोरखष्ट जिल्ह्यातील सोहगौडा येथे सापडला आहे. (२) हा ताम्रपट मौर्य काळातील असून त्यावर ब्राह्मी लिपीत लेख कोरलेला आहे. (३) या ताम्रपटावर अनेक चिन्हे कोरलेली आहेत. वृक्ष व त्याभोवती बांधलेला पार हे एक चिन्ह आहे. (४) एकावर एक अशा तीन कमानी असे एका पर्वताचे चिन्ह आहे. चार खांबांवर दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे एक कोठारघराचे। चिन्ह असावे. (५) दुष्काळाची परिस्थिती आल्यास कोणती खबरदारी घ्यावी, धान्य जपून वापरण्यात यावे, या संदर्भात हा आदेश असावा. ताम्रपटाद्वारे असे आदेश त्या काळात राजे लोक जनतेला देत असत.

-------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा